माणगाव प्रतिनिधी
गेली तब्बल सतरा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच महाडकडून लोणेरेकडे येणाऱ्या सर्व्हिस रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावर दररोज हजारो दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने तसेच शालेय बस आणि रुग्णवाहिका ये-जा करतात. मात्र सर्व्हिस रोडवरील खड्डे दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात होण्याच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी अनेकदा संबंधित प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांचे लक्ष या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“कधी भरणार हे खड्डे? एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून या मार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे यापूर्वीच सर्व्हिस रोडची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, तसेच वाहनचालकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करावा, अशी जोरदार मागणी लोणेरे परिसरातील नागरिक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.









